कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. याबाबत वारंवार जमजागृती व समज देऊनही अनेकजण मास्कचा वापर न करताच सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. या नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी पालिका आयुक्तांनी मुंबईत दररोज तब्बल २० हजार लोकांवर कारवाई करण्याचे लक्ष्य विभाग अधिकाऱ्यांपुढे ठेवलं होतं. परंतू, महापालिकेनं दिलेलं हे लक्ष्य गाठताना पालिकेच्या यंत्रणेची दमछाक होत आहे.
दर दिवशी केवळ ३ ते ७ हजारांपर्यंतच लोकांवर कारवाई करण यंत्रणेला शक्य होत आहे. मास्क न वापरणाऱ्यांना २०० रुपये दंड करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक जण मास्क वापरत नाहीत किंवा मास्क लावला असला तरी त्या हनुवटीवर ओढतात. त्यामुळं मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व पालिका अधिकाऱ्यांना दिले होते.
मोठ्या संख्येने लोक विनामास्क फिरत असल्यामुळे दर दिवशी संपूर्ण मुंबईतून २० हजार लोकांना पकडण्याचं लक्ष्यही आयुक्तांनी दिलं होतं. त्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयाला १००० लोकांना पकडण्याचं लक्ष्य दिलं होतं. त्यासाठी विभाग कार्यालयांनीही परिरक्षण, इमारत आणि कारखाने, दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन, अतिक्रमण निर्मूलन, कीटक नियंत्रण, उद्यान खाते अशा विविध विभागांतील अभियंते व कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे.
या कर्मचाऱ्यांना दर दिवशी ५, १० व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात हे लक्ष्य गाठताना कर्मचाऱ्यांची दमछाक होतं आहे. ऑक्टोबर महिन्यात ११ तारखेपर्यंत २६ हजार जणांवर कारवाई करण्यात आली. त्यानुसार, दर दिवशी सरासरी ९५० जणांवर कारवाई केली जात होती.
११ ऑक्टोबरनंतर २० हजार लोकांवर कारवाईचे लक्ष्य गाठता आले नाही तरी कारवाईची संख्या वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत दर दिवशी अडीच हजार ते सात हजारांपर्यंत लोकांवर दर दिवशी कारवाई करण्यात आली आहे. मास्क न लावणाऱ्यांविरोधात ११ ते १७ ऑक्टोबर या ६ दिवसांत मिळून ३२ हजार जणांवर कारवाई करून दंड वसूल करणे पालिकेच्या यंत्रणेला शक्य झालं आहे. त्यातून महापालिकेनं प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे या ६ दिवसांत ५३ लाखांचा दंड वसूल केला आहे.