मुंबईत विना मास्क लोक घराबाहेर पडत असल्याने पालिकेच्या घनकचरा विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. विनामास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्या ६८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलॉकडाऊन करत नागरिकांना कामानिमित्त घराबाहेर पडण्याची, जॉगिंग, वॉकिंग आदीसाठी सूट देण्यात आली. पण घराबाहेर पडल्यावर मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे असे नियम घालून देण्यात आले आहेत. मात्र, अनेक जण हे नियम पाळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
अंधेरी ते दहिसर आणि भांडुप, मुलुंड, ग्रँटरोड या भागात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. त्यासाठी या विभागात पालिका आणि पोलिसांकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मात्र त्यानंतरही मास्क न घालता नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अशा ६८ जणांकडून ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३१३ लोकांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे कोरोनाचे रुग्ण ज्या विभागात मोठय़ा संख्येने आढळून येत आहेत, अशा अंधेरी पूर्व, मालाड, कांदिवली, दहिसर, बोरिवली, मुलंड या भागांतूनच दंडवसुली करण्यात आली आहे. ३० जून रोजी ३५ लोकांकडून ३५ हजार रुपये तर १ जुलै रोजी १६ जणांकडून १६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांत सर्वाधिक दंडवसुली कांदिवलीतून ३५ हजार इतकी करण्यात आली आहे. तर अंधेरी पूर्वेतून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३१३ लोकांना समज देऊन सोडण्यात आले आहे. अंधेरी पूर्वमधून १०५ लोकांना, तर मुलुंडमध्ये ८३ लोकांना समज देऊन सोडण्यात आलं आहे.
हेही वाचा -
कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण
दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक