आपल्या बाईकमधून मोठमोठ्याने आवाज यावा आणि लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधलं जावं, या आशेनं आणि अट्टहासानं अनेकजण बाईकमध्ये बदल करतात. मूळ मॉडेलमध्ये बदल करून, मूळचे सायलेन्सर काढून वेगळ्या प्रकारचे आवाज करणारे सायलेन्सर बसवून अशा प्रकारे लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याच्या प्रयत्नात अनेकजण दिसतात. काही जण तर एक नाही तर दोन-दोन सायलेन्सर लावून फिरतात. पण आता अशा महाभागांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य परिवहन विभागानं घेतला आहे.
आवाज करणाऱ्या, मूळ रचनेमध्ये बदल करून अशा प्रकारे आवाज करणाऱ्या बाईक्सवर आणि पर्यायाने त्यांच्या मालकावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१८पासून अशा बाईक्सवर कारवाई होणार आहे. पुढील महिन्यापासून अशा बाईक्सचा सर्वे केला जाणार आहे.
परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. मात्र, पुन्हा तोच गुन्हा करणाऱ्यांवर थेट अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईसह राज्यातल्या सर्व प्रमुख शहरांमधल्या मॉडिफाईड बाईक्स तपासल्या जात असून त्यातून होणाऱ्या ध्वनी आणि वायूप्रदूषणाची नोंद करण्यात येत आहे.
परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाईकच्या मूळ रचनेत आणि विशेषत: सायलेन्सरमध्ये बदल केल्यामुळे ध्वनीप्रदूषणात भर पडू शकते. तसेच, वायूप्रदूषण करणारे घटकही मोठ्या प्रमाणावर हवेत सोडले जाऊ शकतात. साधारणपणे ८० डेसिबलपर्यंत आवाजाच्या पातळीला मान्यता देण्यात आली आहे. मात्र, बाईक्सचा आवाज हा सरासरी ९० डेसिबलपर्यंत जातो. तर, सायलेन्सरमध्ये बदल केल्यामुळे हाच आवाच १०० ते ११० डेसिबलपर्यंत जातो.
अशा प्रकारे सायलेन्सरमध्ये बदल करून देणाऱ्या गॅरेजवरही पोलिसांची बारीक नजर असणार आहे. अशा गॅरेजेसवर धाड टाकून त्यांना दंड ठोठावण्यापासून ते कायमचे बंद करण्यापर्यंत कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा