मुंबईसह (mumbai) राज्यभरात दिवसेंदिवस थंडी (winter) वाढत चालली आहे. मुंबईच सर्वत्र थंड वातावरण असून, पहाटेच्या गारव्यामुळं मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत आहे. नोव्हेंबर महिना जसजसा पुढे सरकत आहे तसतशी थंडी आणखी वाढत चालली आहे. शिवाय, मुंबईचं किमान तापमान (minimum temperature) १९.४ अंश नोंदविण्यात आलं आहे.
बुधवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी इथं ९.९ अंश सेल्सिअस एवढं नोंदविण्यात आलं असून, मुंबईचं किमान तापमान (mumbai minimum temperature) १९.४ अंश सेल्सिअस आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर गारठला आहे. पुण्यासह नाशिकमध्ये थंडीनं कहर केला आहे. मागील ४ दिवसांपासून पुणे आणि नाशिकचं किमान तापमान सातत्यानं १० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
महाबळेश्वर इथं यंदा पुन्हा बर्फाची चादर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सांगली, नांदेड, उस्मानाबाद, मालेगाव, सातारा, बारामती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, जालना येथील किमान तापमान १५ अंशाखाली घसरले. पुढील २ दिवस तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज असून, दिवाळीत थंडी कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.