मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णांच्या क्वारंटाईन नियमावलीत मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार ५० वर्षे व त्या पुढील वयाच्या कोरोना रुग्णांना आता घरी विलगीकरणात राहता येणार नाही. या रुग्णांना कोणतीही लक्षणं नसली मात्र त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये रहावं लागणार आहे. याबाबतचं परिपत्रक पालिकेने काढलं आहे.
मुंबईत हळूहळू आता कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. रोज रुग्णांची संख्या घटत आहे. अशातच पालिकेने आता क्वारंटाईन नियम बदलले आहेत. ५० वर्षे वयाच्या पुढील रुग्णांना घरी नाही तर कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. या रुग्णांच्या घरी आणि इमारत किंवा चाळीच्या कॉमन जागांवर पालिकेकडून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. ५० ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा मृत्युदर अधिक असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. याआधी सौम्य लक्षणे असलेल्या ६० वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तींना घरी राहता येत होतं.
परदेशातून विमानाने मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना टेस्ट करण्यात येईल. परदेशातून मुंबईत दाखल होणाऱ्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असणार आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा -
मुंबईतील अनेक रुग्णालयं होणार नॉनकोविड
मुंबईत ऑगस्टमध्ये मलेरियाचे ५९२ रुग्ण