रत्नागिरीत पोलिसांसाठी वसाहत बांधण्याचं म्हाडा प्राधिकरणाने ठरवलं असून या वसाहतीत ५६० घरांचा समावेश असेल. तसंच सर्व प्रकारच्या सोई-सुविधा या वसाहतीत असतील. यासंदर्भातील घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली.
राज्यात विविध ठिकाणी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सध्या हक्काच्या घरांची कमतरता जाणवत आहे. मुंबईत पोलिस वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरांची दुरावस्था झाली असून काही ठिकाणी तर इमारती देखील मोडकळीस आल्या आहेत. अशा स्थितीत पोलिसांसाठी वसाहत बांधण्याचा निर्णय सकारात्मक ठरू शकतो.
राज्य सरकारने परवानगी दिल्यास राज्यभरात ठिकठिकाणी देखील पोलिस वसाहती उभारण्याची तयारी म्हाडाने दर्शवली आहे. त्यासोबत विरार इथं अल्प उत्पन्न गटासाठी ५२० घरांची आणि मुंबईतील पवई भागात येत्या २ ते ३ वर्षांत ४५० घरांसाठी सोडत निघेल, असंही सामंत म्हणाले.
सोबतच सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरातील घरांच्या डागडुजीसाठी म्हाडाकडून १० कोटी रुपये देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा-
रहिवाशांना विश्वासात घेऊनच मोतीलाल नगरचा पुनर्विकास, म्हाडाचं स्पष्टीकरण
डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी अधिकारी, ठेकेदार, ट्रस्टीवर गुन्हा