भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह शुक्रवारपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. कर्जमाफीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपा-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतेही सरकारच्या कारभारावर जाहीर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आगामी मुंबई दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने काय फासे टाकावेत, याचा आढावा घेण्यासाठी अमित शाह येणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. याशिवाय अमित शहांच्या मुंबई दौऱ्याचा आणखी एक खास हेतू असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. दादर-माहिमचा परिसर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात भाजपाची पाळेमुळे कशी रूजवता येतील, यादृष्टीने ते या भागातील स्थानिक लोकांशी संवाद साधणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाला ते सहज शक्य होणार नाही, असे स्थानिक शिवसेना-मनसे नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहा यांच्या या मुंबई दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.