आरोग्यविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने फिव्हर क्लिनिक (fever clinics) सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिली. सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना ठाकरे यांनी ही माहिती दिली. या क्लिनिकमुळे कोरोनाशी (coronavirus) संबंधीत रुग्णांना इतर रुग्णांपासून दूर ठेवता येईल, तसंच इतर रुग्णांना व्यवस्थित उपचार देणं शक्य होईल, असंही ते म्हणाले.
३ वेगवेगळे रुग्णालय
यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपण ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक खोलतोय. सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणे ज्यांना असतील, त्यांनी इतर रुग्णालयांमध्ये जाऊ नका, आपण सुरू करत असलेल्या फिव्हर क्लिनिकमध्येच (fever clinics) थेट जा. प्रत्येक विभागांत फिव्हर क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. हे क्लिनिक कुठं असतील, त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल. तिथं गेल्यावर तुम्हाला तपासलं जाईल आणि त्यानंतर मार्गदर्शन केलं जाईल की आपण कुठे जायला पाहिजे.
हेही वाचा- मुंबईत मास्कविना बाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार
ज्यांना सौम्य लक्षणे दिसतात त्यांच्या साठी एक हॉस्पिटल असेल. त्यांना थोडी लक्षणांची तीव्रता आहे त्यांच्यासाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांना तीव्र किंवा गंभीर लक्षणे आणि तब्येतीच्या इतर तक्रारी असतील त्यांच्यासाठी आणखी एक वेगळे हॉस्पिटल असेल पण तिसरे जे असेल ते पूर्ण सुसज्ज असेल
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2020
गंभीर आजार असणाऱ्यांसाठी
ज्यांना सौम्य लक्षणे दिसतात त्यांच्यासाठी एक रुग्णालय असेल. ज्यांच्यात लक्षणांची तीव्रता थोडी अधिक आहे त्यांच्यासाठी दुसरं रुग्णालय असेल आणि ज्यांना तीव्र किंवा गंभीर लक्षणे आणि तब्येतीच्या इतर तक्रारी असतील त्यांच्यासाठी आणखी एक वेगळं रुग्णालय असेल. त्यातील तिसरे रुग्णालय पूर्ण सुसज्ज असेल. कोरोना शिवाय उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनीविकार इतर गंभीर आजार असणाऱ्यांसाठी हे रुग्णालय असेल या रुग्णालयात त्या त्या आजारांवर उपचार करणारे निष्णात डॉक्टर उपलब्ध असतील, ते म्हणाले.
सर्वांची सुरक्षा
यामुळे इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळू शकतील. तसंच कोरोनाची लागण असलेल्या रुग्णांना देखील या रुग्णांपासून वेगळं ठेवता येईल. जेणेकरून कोरोनामुळं पूर्ण रुग्णालय सील करण्याची वेळ येणार नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुरक्षीत ठेवता येईल, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
आरोग्य विभागात काम केलेले निवृत्त सैनिक असतील, निवृत्त परिचारिका व वॉर्डबॉय ज्यांना कामाचा अनुभव आहे, प्रशिक्षण पूर्ण केलेले अनेक जण, त्यांची या युध्दात सहभागी होण्याची हिंमत आणि तयारी असेल त्यांनी मी आवाहन करतो, सोबत या, आपली महाराष्ट्राला गरज आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 8, 2020
कोरोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्या आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी जसं की आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतू ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळालं नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे येऊन आपले नाव, पत्ता covidyoddha@gmail.com या ई मेल वर नोंदवावे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
हेही वाचा- गैरसमज करून घेऊ नका, केंद्राकडून फक्त तांदूळ मिळतोय- मुख्यमंत्री