राज्यात नवं सरकार येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या टोलवसुलीविरोधात मनसे मैदानात उतरली असून मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी ठाण्यातील आनंदनगर टोल नाका इथं साखळी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासहित पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
हेही वाचा- आता यू टर्न नकोच, बुलेट ट्रेनबाबत मनसे आमदाराची भूमिका
दररोज कामधंद्यानिमित्त हजारोजण ठाण्यातून मुंबईत आणि मुंबईतून ठाण्यात प्रवास करतात. त्यातील अनेकांना आनंदरनगर टोल नाका ओलांडून जावं लागतं. अशावेळी या वाहनचालकांना दरवेळी टोलचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे या टोलपासून सर्वसामान्यांना मुक्ती मिळावी यासाठी सर्वतऱ्हेचे प्रयत्न करूनही यश येत नसल्याने अखेर मनसेच इथं धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
याआधी मनसेने ९ नोव्हेंबर रोजी आनंदनगर टोलनाका ते कोपरी पुलापर्यंत मानवी साखळी आंदोलनाचं आयोजन केलं होतं. परंतु अयोध्या निकालामुळे या आंदोलनाला परवानगी न मिळाल्याने हे आंदोलन पुढं ढकलण्यात आलं होतं.