सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत असून अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. मतदान सुरू होऊन ५ तास उलटल्यानंतरही ईव्हीएम मशीन बंद असल्याने मतदार मतदान न करताच घरी परतले.
सकाळी ७ वा. पासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीचा निकाल ३१ मे रोजी जाहीर होणार आहे.
यंदा प्रथमच निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे. मात्र बऱ्याच मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान मंदावली आहे. पालघरमध्ये पहिल्या दोन तासांत ७ टक्के मतदान झालं आहे.
भाजपा खासदार चिंतामण वनगांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. भाजप आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे.
पालघरमधील सायवण २६३, मेढा, माजिवली येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान थोड्या काळासाठी थांबलं होतं. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे. नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद असल्याचं समजतं. मनवेल येथील १०७, ११७ हे दोन्ही बूथवर मतदान २० मिनिटे उशिरा सुरू झालं. तर नालासोपारा येथील बूथ क्रमांक १३ मधील दोन मशीन बंद आहेत.
पालघरमध्ये ज्या ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद झालेल्या आहेत त्या ठिकाणी वेळ वाढून द्यावा. मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल १ रुपयांनी स्वस्त केलं. भाजप साम-दाम-दंड-भेदचा वापर करत आहे. भाजपाचा रडीचा डाव सुरूच आहे.
हितेंद्र ठाकूर, आमदार
हेही वाचा-
क्लिपप्रकरणी दोषी आढळल्यास कारवाई करा- मुख्यमंत्री