महाराष्ट्र नवनिर्माण सेना घुसखोरांविरोधात काढत असलेल्या मोर्चाला भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. हा आरोप म्हणजे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचं लक्षण आहे, अशा शब्दांत मनसेकडून शिवसेनवर पलटवार करण्यात आला आहे.
देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातून शेकडो मनसैनिक मुंबईत येऊन दाखल झाले आहेत.
या मोर्चावर शिवसेनेच्या प्रवक्त्या अॅड. मनीषा कायंदे यांनी टीका केली. 'शिवसेनेनं भाजपची साथ सोडल्याने भाजप महाराष्ट्राच्या राजकारणात एकटा पडला आहे. त्यामुळे भाजप सातत्याने जोडीदाराची चाचपणी करत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या आधी भाजपने वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग मधल्या काळात करून पाहिला. पण हा प्रयोग चांगलाच फसला. त्यामुळं भाजपने आता हिंदुत्वाच्या वाटेवर असलेल्या मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. आधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांची घेतलेली भेट हा त्याचा पुरावा आहे. या भेटीगाठीच्या माध्यमातून भाजप मनसेच्या मोर्चाला छुपा पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट हाेत आहे,' असं कायंदे म्हणाल्या होत्या.
त्याला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सडेतोड उत्तर दिलं. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने याआधी अनेकदा आंदोलने केली आहे. या घुसखोरांना देशातून हाकलून दिलं पाहिजे, ही भूमिका मनसेची आजची नाही. परंतु तरीही मनसेला भाजपशी जोडण्याचा शिवसेनेकडून केला जात आहे. मुळात शिवसेना हिच काँग्रेसची बी टीम आहे. मनसेवर अशा प्रकारचे आरोप करणं म्हणजे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याचं लक्षण आहे. अशा शब्दांत देशपांडे यांनी कायंदे यांचे आरोप खोडून काढले.
रविवारी दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. मनसेच्या मोर्चात पदाधिकारी, कार्यकर्ते पुढे असतील आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील. शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात प्रवेश करतील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटच्या माध्यमातून आझाद मैदानात येतील.
आझाद मैदानात भव्य स्टेज उभारण्यात आला असून तिथं आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. त्यानंतर शेवटी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा काढण्यामागचा नेमका उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता होईल.