निवडणुकीआधी सर्वसामान्यांना आश्वासनं देणाऱ्या मोदी सरकारनं भ्रष्टाचार, महागाई, नोटाबंदी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वांची घोर निराशा केलीय. चिखलात कमळ उगवतं असं म्हटलं जातं, पण इथं फक्त मळच उरलाय. संपूर्ण देशात कारभाराचा चिखल झालाय, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.
कुणाला हवीय बुलेट ट्रेन, हे ओझं मुंबईकरांच्या खांद्यावर कशाला? त्याआधी रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारा. घरातून कामाला निघालेल्या सर्वसामान्याला घरी परतू की नाही अशी चिंता लागलेली असताना रेल्वेचा पूल प्रशस्त होईल, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल बोलायला लागलेत. पण तुम्हाला हे आत्ता सुचलं काय? दुर्घटना घडल्यानंतर उच्च स्तरीय समिती नेमण्याऐवजी स्वत: गर्दीने भरलेल्या जिन्यावरून उतरून दाखवा, असे आव्हान त्यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले.
राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेली शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार काय? उद्धव ठाकरे 'निर्णय' घेणार काय? याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागलेले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्य मुद्द्याला बगल देऊन दादरच्या शिवाजी पार्क मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांची निराशा केली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इथे बसून अमरनाथ यात्रेंकरुंचे रक्षण केले होते. पण आता अमरनाथ यात्रेकरून आपले सरकार असतानाही हल्ला होत आहेत. एवढे आपले सैन्य दुबळे झाले का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी सैन्य दुबळे नाही, तर आपला सेनापतीच दुबळा ठरलाय,अशी जोरदार टिका उद्धव ठाकरे यांनी
बनारस हिंदू विद्यापीठात तक्रार केलेल्या मुलींना दिलासा देण्याऐवजी पीडित मुलींना लाठीने बडवून काढलं जातंय. हे कसलं हिंदुत्व? हे हिंदुत्व नाही! गाईला जपायचं आणि ताईला झोडायचं असलं हिंदुत्व आम्हाला नकोय, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारचा समाचार घेतला. हिंदुत्वाची व्याख्या काय? हे आता भाजपाला विचारायची वेळ आली आहे. शेंडी, जानवं मानणारे आम्ही हिंदू नाही. देवळात घंटा बडवणारे हिंदू आम्हाला नकोय, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यामुळे हिंदू, आणि पर्यायाने हिंदुत्वाची तसेच हिंदुस्थानची बदनामी होत असल्याचे म्हटले आहे. ज्या क्षणाला हिंदुत्व फुटेल, तेव्हा तुमचे नशीब फुटेल. हिंदुचा विश्वास घात करू नका, असाही इशारा भाजपाला दिला.
शिवसेनेच्या आंदोलनावरून शरद पवार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. याचा समाचार घेत उद्धव ठाकरे यांनी, पवार साहेब माफ करा, मी तुमचा शिष्य नाही, मी बाळासाहेबांचा शिष्य आहे, तुम्ही लपून छपून करतात ते आम्ही बेधडक करतो, असा चिमटा काढला. आमच्याकडे अदृष्य आणि पारर्शक शब्द नाही. जे आहे ते बेधडक.
महागाई आणि जीएसटीने सर्वसामान्य त्रस्त झालेत. आमच्या सरकारने ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. तसे मोदींनी ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवावेत. संपूर्ण देशात जो जीएसटी आणला, समान कर लावला, तसा समान दर लावा.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)