सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली आहे. '2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होऊ देणार नाही'' असं म्हणत शिवसेनेनं भाजपविरोधी धार वाढवली आहे. मंगळवारी 19 जून रोजी शिवसेनेचा 52वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
'या निवडणुकीत महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईल. दिल्लीच्या तख्तावर कोण बसाणार याचा निर्णय घेण्याची ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करेल. असा दावा करत शिवसेनेने भाजपला आव्हान दिलं आहे.
'मुंबई नासवण्याचं कारस्थान रचलं जात आहे. मुंबईतील अनेक उपनगरांची नावं बदलण्याचा सपाटा लावला जात आहे. ज्यांना या भागांची नावे बदलून बाजार’ मांडायचा आहे, त्यांनी आधी आपल्या बापांची नावं बदलून यावं', असं म्हणत शिवसेनेनं भाजपला खडेबोल सुनावलेत.
'सत्तेचा माज आम्हाला कधी चढला नाही आणि पुढेही आम्ही तो चढू देणार नाही. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीत आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे आणि राज्य चालवणे मुश्कील होईल', असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
'शिवसेनेच्या मार्गात अडचणींचं डोंगर असलं तरी ते ओलांडलं की डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारकं निर्माण होतील. 2014 च्या राजकीय अपघाताची पुनरावृत्ती 2019 मध्ये होणार नाही' असा इशारा सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे.
हेही वाचा -