मागील काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातील स्टॉलच्या पोटमाळ्यावर लिंबू सरबतासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच मध्य रेल्वे प्रशासनानं घटनेची तातडीनं दखल घेत, स्टॉल मालकाविरोधात कारवाई करत स्टॉलला टाळं ठोकलं. त्यानंतर, या विक्रेत्याच्या लिंबू सरबताची तपासणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यातून हे लिंबू सरबत मानवी आरोग्यास योग्य नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळं या विक्रेत्याविरोधात ५ लाखांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेनं केलेल्या या तपासणीत लिंबू सरबतामध्ये ई-कोलाय हे जीवाणू जास्त आढळून आले. या जीवाणूंमुळं प्रवाशांमध्ये ताण वाढणं, अतिसार होऊ शकतो. तसंच, या लिंबू सरबतामुळं प्रवाशांना न्युमोनिया, मूत्राशयाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं मध्य रेल्वे प्रशासनानं लिंबू सरबत, काला खट्टा आणि आॅरेंज ज्यूस बंद केले. यावर तोडगा काढण्यासाठी स्टॉलधारकांनी वेगवेगळ्या कंपनीच्या आणि विविध चवीच्या पॅकिंग शीतपेयाच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या. तसंच, मोठ्या प्रमाणात उकाडा असल्यामुळं या पॅकिंग सरबताच्या बाटल्यांसाठी प्रवाशांची मागणी वाढली आहे.
हेही वाचा -
जमिन बळकवल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला अटक
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांचं मुंबईत आंदोलन