हवामान विभागाने राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, पालघर या भागातील नागरिकांनाही दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 27 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अधिकारी सुष्मा नायर यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, रायगड आणि मुंबईतील काही ठिकाणी चक्रीवादळा सारखी स्थिती निर्माण झाल्यामुळं तापमानात वाढ होणार आहे. 27 आणि 28 एप्रिल रोजी तापमानात कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळं नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या मध्यातच उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. या महिन्यात दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एप्रिल 15 ते 16 या दिवशीही मुंबई आणि परिसरातील शहरातील तापमानाने उसळी घेतली होती. मुंबई लगतच्या नवी मुंबईत पारा 41 च्या पार पोहोचला होता.
उष्णतेच्या झळा वाढत असल्याने भारतीय प्रादेशिक हवामान विभागाने नागरिकांना दुपारी 12 ते 3 यावेळेत घराबाहेर न पडण्याचे अवाहन केले आहे. तसंत, भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा, भडक रंगाचे कपडे वापरू नका त्याऐवजी कॉटनचे ड्रेस वापरा. घराबाहेर निघताना टोपी किंवा स्कार्फ बांधा.
हेही वाचा