Advertisement

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकारी तसंच पोलीस यंत्रणेला दिले आहेत.

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
SHARES

गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग (coronavirus) रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे. त्यामुळे राज्यात ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकारी तसंच पोलीस यंत्रणेला दिले आहेत.  

कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही. निर्बंधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका. संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. त्याकरीता राज्यातील जिल्हा प्रशासनाने अधिक दक्ष राहावं, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसंच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत बोलत होते. 

गर्दी होता कामा नये

राज्य सरकारने जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे, असं दृश्य दिसता कामा नये. अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

विवाह समारंभ जबाबदार

विवाह समारंभ हे कोरोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचं लक्षात आलं आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावं, असंही उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले.

हेही वाचा-

कोरोना विषाणूचं म्युटेशन

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना विषाणूचं म्युटेशन झालेलं आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळलं आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संसर्गित झाली आहे. ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत नेमकेपणाने काय करायचं ते राज्याच्या तज्ज्ञ टास्क फोर्सकडून समजून घ्यावं.

कंटेन्मेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्या

ऑक्सिजनचा उचित व योग्य वापर तसंच रेमडेसिवीरसंदर्भात काळजीपूर्वक पाऊले उचलावी लागतील. तसंच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावं. सर्व रुग्णालयांचं अग्नी सुरक्षा ऑडीट त्वरेने पूर्ण करून घ्यावं, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये. सूक्ष्म आणि लहान कंटेन्मेंट क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

कडक निर्बंधांची चांगली अंमलबजावणी होईल हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावं आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाला तातडीने मार्गदर्शन मागावे, असं मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले.

यावेळी राज्य शासनाने दुर्बल घटकातील व गरीब लोकांसाठी जाहीर केलेले आर्थिक सहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही यादृष्टीने चांगलं नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

(maharashtra cm uddhav thackeray orders to take strict action under break the chain rules)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा