एकीकडे पवई तलावाच्या सुशोभिकरणासह त्यातील सांडपाण्याचा प्रवाह रोखण्याकरता उपाययोजना राबवल्या जात आहेत, तर दुसरीकडे अजूनही आसपासच्या झोपडपट्टी परिसरातील मलमिश्रीत सांडपाण्याचा प्रवाह या तलावात सोडला जात आहे.
पेरुबाग आणि निटी कॉम्प्लेक्ससह अनेक भागांमध्ये मलवाहिन्याच नसल्यामुळे आता या ठिकाणी मलवाहिन्या टाकल्या जाणार असून यासाठी मलनि:सारण पंपिंग स्टेशन्सही बांधली जाणार आहेत.
पवई तलावातील पाण्याचे शुद्धीकरण तसेच सुशोभिकरण करताना पावसाळा वगळता जे मलवाहिनीतील पाणी तलावात सोडले जाते, अशा मलवाहिन्यांचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने फ्रिशमन प्रभू यांची सल्लागार म्हणून निवड केली होती. या सल्लागाराने आदीशंकराचार्य मार्गावरील मलवाहिन्या प्रवाहित करण्यासाठी उदंचन केंद्र बांधण्याची सूचना केली आहे.
आदी शंकराचार्य मार्गावरील गेट क्रमांक १, २, ११, १२, १३, १४, १७, १८ आणि १९ मधून प्रवाहित होणारा बिनपावसाळी जलप्रवाह हा येथील मलवाहिन्यांमध्ये प्रवाहित करण्यासाठी हायड्रो ब्रेक बसवणे आणि पेरूबाग आणि निटी कॉम्प्लेक्स येथील बिनपावसाळी जल मलवाहिन्यांमध्ये प्रवाहित करण्यासाठी निटी येथील महापालिकेच्या सुरक्षा चौकीजवळ मलजल उदंचन केंद्र बनवणे आणि वाहिन्या टाकण्याची कामे सुचवली असल्याचे मलनि:सारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या कामासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असून कंत्राटदार निश्चित करून यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.