इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) बाराव्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने विजयी सलामी दिली आहे. प्रथम फलंदाजी करत सलामीवीर शिखर धवन (४३), कॉलिन इन्ग्राम (४७) आणि ऋषभ पंत (७८) या फलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीचा जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबईसमोर २१४ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, दिल्लीने दिलेल्या २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाला १७६ धावांपर्यंतच मजल मारत घरच्या मैदानावर पहिला पराभव सहन करावा लागला.
दिल्लीने दिलेल्या २१४ धावांचे लक्ष्य पार करत असताना मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर क्विंटन डी-कॉक कमी धावा करून बाद झाले. त्यानंतर, युवराज आणि कृणाल पांड्याने चांगली खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तसंच, युवराज सिंहने ३५ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर अर्धशतकी खेळी केली. पण इतर खेळाडूंची साथ न मिळाल्यामुळे युवराजची ही झुंज अपयशीच ठरली. त्यामुळे मुंबईला दिल्लीकडून ३७ धावांनी पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय मुंबईच्या अंगलट आला. दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतने तुफानी खेळी करत २६ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर नाबाद ७७ धावांची खेळी साकारली.