असं म्हणतात की पैशाची लालच इतकी मोठी असते की चांगल्या लोकांचा प्रामाणिकपणाही त्याच्यापुढं टिकाव धरत नाही. मात्र, असेही काही लोक असतात की त्यांनी पैशापेक्षा अापला प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. असंच काहीसं झालं बोरिवलीवरून भाईंदरला जाणाऱ्या करिश्मासोबत.
करिश्मा बोरिवलीहून भाईंदरला रिक्षाने जात होती. भाईंदरला उतरल्यानंतर काही वेळाने अापली बॅग रिक्षातच विसरल्याचं करिश्माच्या लक्षात अालं. या बॅगमध्ये १ लाख २५ हजार रुपये होते. करिश्माने तात्काळ याची माहिती भाईंदर पोलिस स्थानकात दिली. तर दुसरीकडे रिक्षाचालक अतुल मनोहर बोरड जेव्हा रात्री घरी गेले तेव्हा त्यांना पैशाची बॅग अापल्या रिक्षात सापडली. त्यांनी लगेचच ही बॅग बोरिवली पोलिस स्थानकात जमा केली. तपास केला असता ही बॅग करिश्मा यांची असल्याचं समजलं. पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी करिश्माला बोलावून पैशाची बॅग त्यांना सोपवली.
हल्लीच्या जगात प्रामाणिकपणाचं हे दुर्मिळ उदाहरण पहायला मिळाले. या प्रामाणिकपणाची दखल घेत बोरिवली पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांनी अतुल बोरड यांना सन्मान केला.
हेही वाचा -
भिंवडी दंगलीतील मुख्य सूत्रधाराला अटक
लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल