मुंबई - अरबी समुद्रातील बार्जवर झालेल्या दुर्घटनेत तीन खलाशांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. मालवाहू बार्जमधील साचलेल्या पाणी आणि धान्यामुळे तयार झालेल्या दूषित वायूच्या संपर्कात आल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जातंय. यात तिघांचा मृत्यू तर अन्य तीन खलाशी जखमी झाले आहेत.
शुक्रवारी रात्री अरबी समुद्रात साडेचार नॉटिकल माइलवर "एमव्ही ओरियन दोन" हे जहाज माल भरत असताना, सांडपाण्याची टाकी जास्त भरल्याने जहाज किंचीत एका दिशेला कलंडलं. तत्काळ पातळी कमी करण्यासाठी एक खलाशी आत उतरला मात्र आत उतरता क्षणी त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो तिथेच कोसळला. त्याला वाचवण्यासाठी बार्जच्या मास्टरसह इतर चार खलाशी उतरले.
जसे हे खलाशी आत उतरले तसा त्यांना आतील वायूचा त्रास सुरु झाला. हा वायू इतका विषारी होता की मंगेश भोसले (27) केटीसंन (27) जयंता चौधरी (24) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दाऊर कोरीयर, शर्मासन मंडल आणि गणेश बाहिया हे जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत बार्जचा मास्टर दाऊद कुरे अत्यवस्थ असून त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.