कोरोना संकटकाळ असतानाही शाळा व्यवस्थापनांनी शाळा फीमध्ये वाढ केली असून ही फी भरणे पालकांना अशक्य होत आहे. मुंबईसह राज्यभरातील अनेक शाळा, विशेषत: इंग्रजी माध्यमांच्या आयसीएसई/ सीबीएसई/ इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांमधील पालकांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येत आहेत. याविरोधात मनसेनं पुढाकार घेतला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री. बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बिलाबाँग इंटरनॅशनल, रायन इंटरनॅशनल आणि राजाराणी मल्होत्रा विद्यालय या तीन शाळांचे पालक देखील सोबत होते.
फी वाढ आणि वापरात नसलेल्या सुविधांशी संबंधित शुल्क, डिजिटल शिक्षणाचा दैनंदिन कालावधी आणि गुणवत्ता, तसंच शिक्षण हक्क (आरटीई) कायद्याची अंमलबजावणी यासंदर्भातील चौकशी अहवाल मागवण्यासाठी आणि दोषी शाळा व्यवस्थापनांवर कठोर कारवाईसाठी विशेष अधिका-यांची किंवा विशेष समितीची नेमणूक करावी. अडचणीत सापडलेल्या पालकांना ठोस दिलासा द्यावा, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांकडे केली.
कोरोना संकटकाळात शाळा व्यवस्थापन जर पालकांचे आर्थिक शोषण करत असतील, तर त्यांना जाब विचारून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री. बच्चू कडू यांनी शालिनी जितेंद्र ठाकरे यांना दिलं.
हेही वाचा