मुंबईजवळ अनेक वॉटरफॉल्स आहेत. पावसाळ्यात हे वॉटरफॉल पर्यटकांनी तुडूंब भरून वाहत असतात. आपल्यापैकी अनेक जण वर्षातून एकदा मुंबईजवळील अनेक वॉटरफॉलपैकी एका वॉटरफॉलला भेट देतात. तिथल्या निसर्गरम्य वातावरणात मजा, मस्ती करतात. बस... तितकंच काय ते पर्यटकांचं पर्यावरणाशी नातं. एकदा तिथून निघालं की पुन्हा त्याच्याकडे वळून पहायचं नाही. पण आपण कितीही दुर्लक्ष केलं काय किंवा डोळे झाकले काय? पण परिस्थिती बदलत नाही आणि हेच सत्य आहे.
वॉटरफॉल परिसरात पर्यटक अक्षरश: उकिरडा करतात. कचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या पेपर प्लेट्स हे सर्व तिथंच टाकून निघून जातात. यामुळे आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांना तर त्रास सहन करावा लागतोच. यासोबतच पर्यावरणाचा ऱ्हासदेखील होतो. पण ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी एनव्हायरमेंट लाइफचे संस्थापक धर्मेश बराई यांनी उचलली आहे. एनव्हायरमेंट लाइफ या संस्थेला नुकतीच दोन वर्ष झाली. या निमित्तानं नेरळ इथला टपालवाडी वॉटरफॉल २५ सहकाऱ्यांसोबत स्वच्छ करण्यात अाला. या वॉटरफॉल परिसरातून एकूण ७५൦ किलो कचरा गोळा केला.
आतापर्यंत संस्थेतर्फ १३ धबधबे स्वच्छ केले आहेत. त्यातून जवळपास ७५०० किलो कचरा जमा करण्यात आला. या उपक्रमात विविध शाळा, कॉलेजची मुलं, सायकलिंग ग्रुप मेंबर्स, ट्रेकर्स, खासगी कंपनी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, विविध संस्थेचे सदस्य सहभागी होतात. धबधबा स्वच्छता अभियान हा उपक्रम देशातला पहिला आणि जगातला दुसरा सर्वात मोठा उपक्रम आहे. या आधी चीनच्या एक संस्थेनं असा उपक्रम राबवला होता.
आतापर्यंत काढलेला कचरा
क्रमांक | वॉटरफॉल नाव (स्थळ) | जमा कचरा |
१ | टपालवाडी (नेरळ) | १२० किलो |
२ | जुम्मापट्टी (नेरळ) | १२० किलो |
३ | झेनिथ (खोपोली) | २२० किलो |
४ | पांडवकाडा (खारघर) | २८० किलो |
५ | चिंचोटी (वसई) | ३४० किलो |
६ | आनंदवाडी (नेरळ) | ३४० किलो |
७ | कोंडेश्वार (बदलापूर) | १००० किलो |
८ | भिवपुरी | २५०० किलो |
९ | आनंदवाडी (नेरळ) | ५४० किलो |
१० | पळसदरी | ६०० किलो |
११ | आंबेवाडी (क्रॉस) | १२० किलो |
१२ | ड्राइविंग रेंज (खारघर) | २३० किलो |
१३ | टपालवाडी (नेरळ) | ७५० किलो |
एकूण | ७५०० किलो |
धबधबा स्वच्छता अभियानाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेपासून झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमा आणि तसंच कर्मभूमी ही सह्याद्राच्या पर्वतरांगांभोवती आहे. ऐतिहासिक गड, किल्ले तसंच धबधबे इथल्या संस्कृतीचे विशेष अंग आहेत. पण दिवसेंदिवस महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची अवस्था बिघडत चालली आहे. म्हणून त्यांचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जवाबदारी आहे. जेणेकरून महाराष्ट्राच्या पर्यटनात भर पडेल. त्यासाठी आम्ही या अभियानचा विडा उचलला.
- धर्मेश बराई, संस्थापक, एनव्हायरमेंट लाईफ
अातापर्यंत जमा केलेल्या कचऱ्याचा प्रकार
निसर्ग रक्षणाची जबाबदारी सगळ्यांची आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर त्या ठिकाणी कचरा टाकू नका. जाताना जसं खायला १०-१२ किलो उचलून नेता तसंच परत येतना ४-५ किलो कचरा परत आणा आणि तो रितसर कचऱ्याच्या डब्यात टाका. छोटसं चॉकलेटचं पॅकेट पण कचऱ्याच्या पेटीत टाकायची सवय प्रत्येकानं लावायला पाहिजे. तरच आपला देश स्वच्छ होईल, असं धर्मेश बरई यांनी स्पष्ट केलं.
धबधबा स्वच्छ्ता अभियानात खालील व्यवस्था करण्यासाठी संस्थेनं शासन तसंच MTDC ला पत्र लिहलं होतं. या पत्रात काही मागण्या केल्या होत्या. पण त्याकडे अजून लक्ष दिलं गेलं नाही.
गेल्यावर्षी २७ जुलै २०१७ रोजी शासनातर्फे सांगण्यात आलं होतं की, तुम्ही पत्रात नमूद केलेल्या तक्रारींवर कार्यवाही करू. पण अजूनपर्यंत शासनाकडून कुठलीच कार्यवाही झाली नाही. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर महाराष्ट्राचे धबधबे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बहरतील आणि लोकल टूरिझमचा विकास होईल. तसंच गावकऱ्यांसाठी रोजगार निर्माण होईल, असं बरई यांनी म्हटलं.
गेल्या दोन वर्षांपासून एनव्हायरमेंट लाइफ ही संस्था धबधबा स्वच्छ्ता अभियान राबवत आहेत. पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा पण त्यासोबतच निसर्गाची काळजी देखील घ्यावी. तुम्ही निसर्गाची काळजी घेतली तरच निसर्ग तुमची काळजी घेइल. धबधबा स्वच्छ्ता अभियान मोहीम ही सर्वांसाठी आहे. आपण सर्वांनी त्याची निगा राखणं गरजेचं आहे, हे वारंवार संस्थेकडून पर्यटकांना सांगण्यात येतं.
प्रत्येकानं आपला कचरा ही आपली जबाबदारी आहे असं समजून स्वच्छता ठेवायला पाहिजे. तरच स्वच्छ भारत निर्माण होईल. पण परिस्थिती याच्या उलट आहे. अनेक जण आजही रस्त्यावर कचरा टाकतात. अशांना आळा घालण्यासाठीदेखील एनव्हायरमेंट लाइफनं पुढाकार घेतला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी #TokoandRoko (#टोकोऔररोको) या टॅगलाईन अंतर्गत ट्विटरवर त्यांचा फोटो टाकायचा आहे.
हेही वाचा -