मुंबई - मुंबईतलं सर्वात मोठं तलाव म्हणून ओळखलं जाणारं आणि पूर्व उपनगराचा मानबिंदू असलेलं पवई तलाव आता सुशोभित होणार आहे. या तलावाचा परिसर सुशोभित करण्यात येणार असून, त्याठिकाणी एलईडी दिवे बसवले जाणार आहेत. त्यामुळे पवई तलावाचा कायापालट होणार आहे. पवई तलावाच्या आसपास लोकवस्ती वाढल्यामुळं तेथील सांडपाणी तलावाच्या पात्रात सोडलं जातं. त्यामुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होऊ लागलीय. परिणामी पवई तलावात झिरपणारे मलजल थांबविणे आणि पवई तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. तलावात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून तलावात सोडण्यासाठी उपाययोजना तयार करण्यासाठी फ्रिशमन प्रभू यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. त्यानुसार पवई तलावाकाठच्या जागेचं सुशोभिकरण, इतर बांधकामं, तलावाच्या सभोवताली एलईडी दिव्यांची रोषणाई, सुरक्षायंत्रणा आदी कामं हाती घेण्यात आलीत. या कामासाठी सात ते साडेसात कोटी खर्च करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलाय.