मुंबईकरांना दरवर्षी खड्ड्यांमधून प्रवास करावा लागू नये, यासाठी रस्त्यांचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार असून पहिल्या टप्प्यातील कामाच्या निविदा प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले.
मंत्री उदय सामंत (Uday samant) म्हणाले की, मुंबईतील (mumbai) रस्त्यांचे काँक्रिटीकरण दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसून दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील 212 रस्त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून त्यांच्या जागी 208 रस्त्यांसाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत.
दोन्ही टप्प्यातील रस्ते वेगळे असून पहिल्या टप्प्यातील एकाही रस्त्याचा दुसऱ्या टप्प्यातील कामात समावेश करण्यात आलेला नाही. पहिल्या टप्प्यात एकूण 114 रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार असून पश्चिम उपनगरातील 246 आणि पूर्व उपनगरातील 89 रस्त्यांची कामे सुरू आहेत.
वॉरंटी कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधित कंत्राटदाराकडून त्याची मोफत दुरुस्ती केली जाते. तसेच ठेकेदाराकडून दिरंगाई झाल्यास संबंधित ठेकेदारावर निविदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहर विभागातील पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांसाठी नियुक्त केलेला कंत्राटदार मिस्टर रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा आहे.
रस्त्याच्या कामाची असमाधानकारक प्रगती आणि निविदेतील अटी व शर्तींचे पालन न केल्यामुळे, सदर कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून त्याची रक्कम व करारनामा जप्त करून दंडात्मक कारवाई महापालिकेतर्फे करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा