कोरोनामुळे लागू झालेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. मागील ५ महिने मुंबईतील मेट्रो सेवाही बंद आहे. कोरोना काळात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मेट्रोची मालकी असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच रिलायन्स उद्योग समूहाने मुंबई मेट्रोमधील भागीदारी विकण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स उद्योग समूहाने सरकारला तसं पत्र लिहिलं आहे.
पाच महिन्यांच्या काळामध्ये मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. पूर्वीपासूनच मेट्रो तोट्यात चालली होती. मात्र कोरोनाने या कंपनीचं कंबरडंच मोडलं आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमधील आपला हिस्सा विकण्याच्या हालचाली रिलायन्स इन्फ्राने सुरू केल्या आहेत.
मुंबई मेट्रो वन प्रा. लि. च्या माध्यमातून मुंबईत पहिली मेट्रो सेवा घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान २०१४ मध्ये कार्यरत झाली. मेट्रो वनमध्ये रिलायन्स इन्फ्राचा ६९ टक्के , एमएमआरडीएचा २६ टक्के आणि पाच टक्के इतरांचा हिस्सा आहे. मेट्रो १ सेवा सुरू ठेवताना त्याच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्यात आले. परिणामी दिवसाला ९० लाख रुपये तोटा होत होता. २२ मार्चपासून मेट्रो सेवा पूर्ण बंद असल्याने तोट्यात मोठी वाढ झाली आहे. त्यापूर्वीचा कर्जाचा बोजादेखील मुंबई मेट्रो वन प्रा. लि.वर आहे.
हेही वाचा -
मेट्रो-३ च्या मार्गातील मिठी नदी खालील भुयारीकरणाचं काम पूर्ण