Advertisement

महाराष्ट्र सीमेवरील पाणी समस्येला 'पळशीची पीटी'चा हातभार

'पळशीची पीटी' चित्रपटाच्या टीमनं पानी फाउंडेशनच्या साहाय्यानं श्रमदान करून महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील दुष्काळग्रस्त गावांना मोलाचा हातभार लावला होता. परिणामी या दुष्काळग्रस्त गावात आता पावसामुळं जलसंपदा भरभरून वाहू लागली आहे.

महाराष्ट्र सीमेवरील पाणी समस्येला 'पळशीची पीटी'चा हातभार
SHARES

महाराष्ट्रावर घोंघावरणारं दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत. या कामी गावकऱ्यांसोबत सेलिब्रिटीजही जमिनीवर उतरून काम करत असल्यानं महाराष्ट्राच्या जल शिवारात मोठी क्रांती घडवली जात आहे. यात जनजागृतीचं काम करत काही चित्रपटांच्या टीमही सहभागी होत आहेत. 'पळशीची पीटी'  चित्रपटाच्या टीमनं देखील पानी फाउंडेशनच्या साहाय्यानं श्रमदान करून महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील दुष्काळग्रस्त गावांना मोलाचा हातभार लावला होता. परिणामी या दुष्काळग्रस्त गावात आता पावसामुळं जलसंपदा भरभरून वाहू लागली आहे. 

आपापल्या शूटिंग आणि कामाच्या वेळा सांभाळत 'पळशीची पीटी' या चित्रपटातील कलाकारांनी पाण्याचं दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी मोलाचा हातभार लावला. यात 'लागीरं झालं जी'मधील जयडी म्हणजेच किरण ढाणे, अजाचा मित्र बनलेला राहुल मगदूम, संदीप जंगम, राहुल जगताप आणि धोंडीबा कारंडे यांनी सांगली, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्हयांतील सहा गावांमध्ये जाऊन श्रमदान केलं, तसंच चित्रपटाच्या टीमनं पानी फाउंडेशनशी संपर्क साधून श्रमदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या चमूचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील अशी गावं निवडली जिथं पाणी संधारणेचं काम झालेलं नव्हतं.

याबाबत सविस्तर माहिती देताना चित्रपटाचे दिग्दर्शक धोंडीबा कारंडे म्हणाले की, महाराष्ट्रात जलसंधारणामध्ये अग्रेसर असलेली संस्था पानी फाउंडेशनच्या चार दिवसीय शिबीरात सहभागी झालो होतो. मला निसर्ग संधारणेची खूप आवड आहे, पण कामाच्या व्यग्रतेमुळं जमलं नव्हतं; परंतु विभागीय समन्वयक आबा लाड यांच्या सहकार्यान' सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील विखळे, अंबवडे गावात तसंच सांगली जिल्हातील जत तालुक्यातील कुळालवाडी आणि जालिहाल खुर्द गावात हिना मुजावर आणि सोलापूर जिल्हातील मंगलवेढा तालुक्यामधील नंदेश्वर आणि हाजापुर येथ श्रमदान केलं. 

महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गावांमध्येही 'पळशीची पीटी'च्या टीमनं श्रमदान करत जल संधारणाच्या कामात सहभाग घेतला आहे. या अनुभवाबाबत कारंडे म्हणाले की, कर्नाटकाच्या बॉर्डर जवळील गावात गेल्यावर तिथल्या लोकांनी फेटे आणि हार घालून आमचं स्वागत केलं. त्यांच्या कडून समजलं की, आजपर्यंत इतक्या लांब कोणतेही कलाकार श्रमदानासाठी पोहचले नव्हते. तिथे शाळेतील शिक्षक सुट्टीवर घरी न जाता शाळकरी मुलांसोबत भर उन्हात श्रमदान करत होते. आता त्या गावांना जलसंपदा लाभणं हे त्या कामाचं यश आहे. लोकांच्या मेहनतीमुळे या गावात जवळपास पन्नास लाख लीटर पाण्याचा साठा जमा झाला आहे. १५० रुपये टँकरनं त्यांनी ५० लाखाची कमाई केल्याचं समजलं. यामध्ये 'पळशीची पीटी'चा खारीचा वाटा आहे. 'पळशीची पीटी... गोष्ट हरवलेल्या प्रत्येकाची!' हा २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

‘सुपर ३०’ महाराष्ट्रात झाला टॅक्स फ्री!

शिवानी मारणार 'अल्टी पल्टी'




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा