देशातील सर्वसामान्यांना अच्छे दिनाची मोठी स्वप्न दाखवत केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने जनतेचा अपेक्षा भंग केला आहे. भाजपा सरकार सामान्य जनतेसाठी काम करत नसून केवळ उद्योगपतींचं हीत साधत आहे, अदानी, अंबानी यांचा हजारो कोटींचा फायदा करून देत असल्याची टीका आम आदमी पार्टीचे दिल्लीतील नेते खासदार संजय सिंग यांनी केली. मुंबई पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपा सरकारच्या काळात न्याय व्यवस्था सुरक्षित राहिलेली नसून न्या. लोया प्रकरण हे त्याच उत्तम उदाहरण आहे. लोया प्रकरणात देशातील जनतेला न्यायाची अपेक्षा आहे. राफेल विमान खरेदीत घोटाळा नसेल, तर त्या संदर्भातील व्यवहाराची कागदपत्रे सरकार का उघड करत नाही? असा प्रश्न आम आदमी पार्टीने केला आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली, त्यांना कर्जमाफी सोडा शेतमालाल योग्य भावसुद्धा भाजपा सरकार देऊ शकलेलं नाही. युवकांना रोजगार देण्याऐवजी नोटाबंदी, जीएसटी यांसारखे निर्णय व्यापारी वर्गावर थोपवून बेकारी व महागाईत भर घालण्याचं काम भाजपा सरकारकडून केलं जात आहे.
दुसरीकडे अदानी, अंबानी, व्हिडिओकाॅन यांसारख्या ठराविक उद्योजकांची जवळपास ८ लाख ५० हजार कोटी रुपयांची कर्ज माफ केली जात असल्याची टीका संजय सिंग यांनी केली.