चौथ्या लाॅकडाऊनच्या (maharashtra lockdown 4.0) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. कोरोना संकटाच्या काळात राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना, वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग याबाबतच्या सूचना पवारांनी मुख्यमंत्र्यांना केल्या.
उपस्थिती आवश्यक
याबाबतची माहिती देताना शरद पवार यांनी सांगितलं की, राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून राज्याचे मंत्री आणि अधिकारी यांची कार्यालयीन उपस्थिती वाढणं आवश्यक आहे. मंत्री व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी योग्य त्या सूचना देणं गरजेचं आहे.
लॉकडाऊनच्या काही अटी शिथील करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल. याकरता दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनामार्फत आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी. दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापनं टप्प्याटप्प्याने उघडली जातील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्यासोबत चर्चा केली. यामध्ये वाहतूक,शिक्षण,शेती,उद्योग अशा विविध विषयांवर माझ्या सूचना मांडल्या.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 19, 2020
योजना राबवा
पूर्वी मागास, अविकसीत भागात उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना राबवल्या जात. त्या धर्तीवर राज्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, उद्योग वाढीसाठी नवीन सवलतींचं प्रोत्साहनपर धोरण आणणं आवश्यक वाटत असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
वाहतूक पूर्वपदावर आणा
लॉकडाऊनमुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. आपण राज्यांतर्गत रस्ते वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आणण्याकरता योग्य ती पाऊले उचलावीत तसंच विमान व रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा.
सरकारी व खासगी बंदरांतील कामाचा वेग काहीसा थंडावला असल्याचं जाणवतं. आयात, निर्यात व देशांतर्गत जलवाहतूक वाढवण्याकरता त्या क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक व तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करावी.
कोरोनासोबत जगण्याची सवय
कोरोना हा आजार इतक्या लवकर हद्दपार होणार नाही. त्यामुळे कोरोना हा जीवनाचा एक भाग समजून, त्याच्यापासून सावध राहून, आरोग्य सांभाळण्याबाबत जनतेमध्ये व्यापक जागृती घडवणे आवश्यक आहे. जपानमध्ये संसर्ग नसतानाही लोक दैनंदिन जीवनात मास्क घालणे, वैयक्तिक स्वच्छता वगैरे पथ्ये पाळतात.
त्याचप्रकारे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हातमोजे घालणे, मास्क,सॅनिटायझर वापरणे, हात साबणाने वेळोवेळी धुणे, सोशल डिस्टन्सिंग हा दैनंदिन नित्यक्रम लोकांनी अवलंबावा यासाठी माहिती-जनसंपर्क विभाग, प्रसारमाध्यमे, जाहिराती यांच्याद्वारे जनजागृती, माहिती व सूचनांचे प्रसारण व्हावं, अशी सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली.