ठाणे व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील श्रमजीवी संघटनेने भिवंडी, ठाणे, कल्याण आणि पालघर जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला आहे. यामुळं याचा फायदा युतीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या २ वर्षांत श्रमजीवी संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन जमीन, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्न, आहारासंदर्भातील प्रश्न आदींबाबत सकारात्मक भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावले होते. आगामी काळातही भिवंडी, ठाणे, कल्याणमधील शेतकरी व आदिवासींचे प्रश्न सोडविण्यात येतील, असा विश्वास संघटनेला असल्याचं स्प्ष्ट करीत श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.
भिवंडी तालुक्यात श्रमजीवी संघटनेचे संघटनात्मक जाळं असून संघटनेने आदिवासी पट्ट्यात अनेक प्रश्न हाताळून आदिवासींना न्याय मिळवून दिला आहे. भिवंडीबरोबरच ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत श्रमजीवी संघटनेने ताकद दाखवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने दिलेल्या पाठिंब्याने युतीच्या उमेदवारांना पाठबळ मिळालं असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
ठाणे व पालघर जिल्ह्यात कुपोषण, रोजगार हमी योजना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न, अंगणवाडी, वन जमीन, रेशनिंग प्रश्न, आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी सिंचन योजना आणि वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्याबाबतच्या विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांची सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर श्रमजीवी संघटनेने युतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला.
हेही वाचा -
शेतकऱ्यांसाठी 'स्वतंत्र अर्थसंकल्प', काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध
खा. संजय राऊत अडचणीत, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस