धारावी - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयात सोमवारी रात्री निधन झालं. त्या 68 वर्षांच्या होत्या. 3 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. चेन्नईतल्या मरिना समुद्रकिनारी मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयललितांच्या निधनानंतर केंद्र सरकारनं देशभरात एक दिवसाचा दुखवटाही जाहीर केला होता.
जयललितांच्या निधनामुळे तमिळ समाज बहुसंख्येनं राहात असलेल्या धारावीतही शोककळा पसरली. धारावीतील 90 फिट रोडवरील कामराज शाळेसमोरील महाराष्ट्र राज्य एआयएडीएमके कार्यालयाबाहेर जयललिता यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते. चित्रपट ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या जयललितांनी बरेच चढ-उतार पाहिले आहेत. पाच वेळा त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या, पण तामिळनाडूच्या जनतेवर त्यांनी नेहमीच राज्य केलं आणि यापुढेही त्यांची ही सत्ता अबाधित राहील.